शेतीमध्ये जर पारंपरिक पिकांना आधुनिकतेची साथ मिळाली तर उत्पन्न खूप मोठ्या प्रमाणात वाढू शकतं. शेतीमध्ये लाखोंचे उत्पन्न घेणारे अनेक शेतकरी महाराष्ट्रात आहेत. शेती हि अनेकदा नैसर्गिक किंवा अनैसर्गिक संकटांनी नेहमीच घाट्यात राहते आणि त्यातून प्रचंड आर्थिक ताण अनेक शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. पण नियोजनबद्ध एखादं पीक घेतलं तर त्यातून करोडोंचं उत्पन्न देखील घेता येतं. हे करून दाखवलं आहे नगर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने. नगरच्या पारनेर तालुक्यातील पिंपळनेर गावचे शेतकरी राजेंद्र गाडेकर हे आपल्या आगळ्यावेगळ्या शेतीतून आज लाखोंचे उत्पन्न घेत आहेत.
राजेंद्र गाडेकर यांनी चंदनशेतीकडे जात या शेतीतून मोठं यश आज मिळवलं आहे. त्यांच्याकडे २७ एकराची चंदनाची लागवड आज आहे. एरव्ही बांधावर किंवा जंगलात उगवणारे चंदनाचे झाड त्यांनी आपल्या २७ एकरात लावले. चंदन लागवडीसाठी सरकारकडून परवानगी घ्यावी लागते. ती परवानगी देखील गाडेकर यांना मिळालेली आहे. गाडेकर यांनी आपल्या शेतात जवळपास ९ हजार झाडांची लागवड केली आहे. चंदनाचं उत्पन्न ८ वर्षांनी येते पण आपण मात्र हे पीक १३ वर्षांनी काढणार असे गाडेकर सांगतात.
आपल्या चंदनाच्या पिकामध्ये त्यांनी आंतरपिक म्हणून सीताफळची लागवड केली आहे. ९००० झाडांमधून गाडेकर यांना करोडोंचे उत्पन्न अपेक्षित आहे. कारण एका झाडांमधून ३० किलो उत्पन्न मिळते. या चंदनाच्या उत्पन्नाला ९ हजार रुपये प्रतिकिलो भाव मिळतो. चंदनाच्या झाडासोबत त्याच्या बियाला देखील मागणी असते. या बियाला ३०० ते ४०० रुपये प्रतिकिलो भाव मिळतो. या बियांचा वापर तेल बनवण्यासाठी केला जातो.
गाडेकर यांचे शेत डोंगरावर आहे. त्यांनी फळबाग लागवडीसाठी आधी शेतात लेव्हलिंग करून घेतली. त्यांनी सुरुवातीला संत्रा, डाळिंब फळबाग लावल्या. पण जेव्हा उन्हाळ्यात पाणी कमी पडू लागलं तेव्हा बाग जळून जात होत्या. पण त्याचवेळी बांधावर असणाऱ्या चंदनाची २ झाडे मात्र हिरवीगार होती. यातून त्यांच्या धान्यात आले कि हे पीक शेतात घेतलं तर फायद्याचं राहील. त्यानंतर त्यांनी चंदन शेतीबद्दल माहिती काढली.
जेव्हा ते सुरुवातीला चंदन लागवडीबद्दल मित्रांना बोलले तेव्हा त्यांनी गाडेकर यांना येड्यात काढले. त्यांनी मात्र चंदन शेती करायचीच हा संकल्प केला होता आणि ते माहिती गोळा करत राहिले. त्यांना चंदन चोरी आणि लागवड करण्यासाठी लागणारा परवाना या अडचणी असल्याचं कळलं. त्यांनी कृषी विभागाकडून माहिती घेणं सुरूच ठेवलं. चंदनाच्या लाकडाचा सुगंधी पदार्थ बनवण्यासाठी वापर होतो. त्याला प्रचंड भाव असल्याने चोरी होण्याची शक्यता खूप असते. तर बियांच्या तेलापासून देखील औषधी बनवल्या जातात.
गाडेकर सांगतात कि एखाद्या शेतकऱ्याला जर चंदनशेती करायची असेल तर सुरुवातीला शासनमान्य नर्सरी मधून रोपे घ्यावी लागतात. नंतर गावातल्या तलाठ्याकडे अर्ज करून पिकाची नोंदणी करून घ्यावी लागते. नोंदणी नंतरच लागवड करावी. एका एकरमध्ये चंदनाची ४१० झाडे बसतात. शिवाय चौथ्या वर्षी गाभा बनण्यास सुरुवात होते. चंदनाच्या कुठलेही आंतरपीक घेणे शक्य असल्याने शेतकऱ्यांचा अधिकच फायदा होतो. चंदनाच्या एका झाडापासून मिळणारे उत्पन्न हे लाखात असते.
एका झाडापासून दीड ते दोन लाख रुपये उत्पन्न मिळतं. हे चंदन सरकारच आपल्याकडून खरेदी करते. याशिवाय चोरी होऊ नये म्हणून सुरक्षा देखील सरकारकडून मिळते. शेताला सौर कुंपण केल्यास त्यातून वाहणारी हलकी वीज चोरी करणाऱ्याला मध्ये येऊ देत नाही. याशिवाय काटेरी झुडपे लावून देखील आपण चंदनाची चोरी रोखू शकतो असं गाडेकर सांगतात. सरकारी कंपनी आपल्याकडून चंदन प्रती किलो नऊ हजार रुपये दराने खरेदी करते.
कशी करायची चंदन लागवड?
चंदनाचे उत्पन्न मिळवण्यासाठी अनेक वर्ष लागत असले तरी त्यातून मिळणार उत्पन्न हे खूप असते. पण अंतरपिकामधून आपण दुसरं लवकर मिळणार उत्पन्न घेऊ शकतो. गाडेकर यांनी १० बाय १२ फुटावर चंदनाची लागवड केली आहे. शिवाय ६ फुटावर आंतरपीक सीताफळ लागवड केली आहे. १० फूट अंतर ठेवल्यास आपल्याला आंतरपीक घेता येतं.
हे पीक आपल्याला गाभ्यातून मिळते. त्यामुळे खोडची काळजी आल्याला घ्यावी लागते. कीड न लागण्यासाठी वर्षातून एकदा पेस्टींग करून घ्यावी लागते. पाणी ३-४ दिवसांनी गाडेकर देतात. एका चंदनाच्या झाडाला एका वेळी २ लिटर पाणी लागतं.