आजकाल शिक्षणाचे महत्व वेगळं सांगण्याची गरज नाही. शिक्षण असेल तरच आज लोक विचारतात हे चित्र आहे. शेतकरी मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत अशा बातम्या आजकाल अनेकदा दिसतात. तर मुली देखील शेतकरी नवरा नकोच म्हणताय. पण शेतीत देखील आजही यश मिळवता येतं असे अनेक उदाहरण आज बघायला मिळतात. आज अशाच एका तरुणाचा प्रवास बघणार आहोत ज्याला एकेकाळी मुलींनी नाकारलं, बँकेने कर्ज देण्यासाठी नकार दिला तो तरुण आज शेतीच्याच बळावर कोटींचा व्यवसाय करतोय.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील राजूर हे गाव. गावातील भिमाजी हाडवळे यांना ३ मुलं. भिमाजी यांचा छोटा मुलगा मनोज हा लहानपणीपासून लाडकं शेंडेफळ होता. मनोज हा दहावीपर्यंत गावातच शिकला. अभ्यासात तो एक सर्वसाधारण विद्यार्थी होता. घरच्यांना आवडेल तेच पुढे करायचं अशी दिशा असणारा तो एक विद्यार्थी. मनोजचं गावात १० वी झाल्यानंतर ११ वी-१२ वी ला प्रवरानगरला प्रवेश घेतला. तिथं रयतच्या कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं. पण सहाजिकच कॉलेजच्या जीवनाची हवा लागली अन शिंग फुटली.
दहावीला ७० टक्के घेऊन पास झालेला मनोज १२ वी ला ६६ टक्के घेऊन पास झाला. १२ विच्या सुट्ट्यांमध्ये मनोजचे वडील भिमाजी यांना अर्धांगवायूचा तीव्र झटका आला. मोठ्या भावावर सर्व जबाबदारी आली. घरच्यांच्या सल्ल्यानेच बीएससी ऍग्री करण्याचं ठरवलं. मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे शासकीय ऍग्री कॉलेजला नंबर लागला. बदनापूर शहराच्या बाहेर असलेलं हे कॉलेज त्यावेळी नवीनच होतं. त्यांनी बीएससी ऍग्री पूर्ण केली. नंतर फेलोशिपची परीक्षा देण्यासाठी दिल्ली गाठली. फेलोशिप मिळाली नाही पण हॉर्टिकल्चर विषयात देशात ३२ वा क्रमांक आला. परभणीला एमएस्सी केली.
एमएस्सी करताना सर्वाना नोकऱ्या मिळाल्या. पण मनोजला काही मिळाली नव्हती. शेवटी वर्ध्याला एक नोकरी मिळाली. विदर्भातील लोक पुण्यात नोकरीला येतात. पण मनोजचं उलटं झालं. नोकरीसाठी तो पुण्यातून वर्ध्याला गेला. वर्ध्याची नोकरी आयुष्य बदलवणारी ठरली. तिथंच टर्निंग पॉईंट आला. तिथं मायक्रो फायनान्स मध्ये काम करण्याची संधी मिळाली. शेतकऱ्यांशी जवळून संपर्क आला. सेवाग्राम आणि पवनार जवळ काम होतं. सेवाग्रामला गांधीजींचा आश्रम प्रसिद्ध आहे. तिथे परदेशी नागरिकांची वर्दळ जास्त दिसायची. त्या फॉरेनरकडूनच पर्यटनाचा अभ्यास केला. त्यातूनच कृषी पर्यटनाची माहिती पहिल्यांदा समजली.
घरी शेण उचलायचं नाही म्हणून शिक्षणाकडे वळलेल्या मनोजला शेतीचं महत्व तेव्हा कळलं होतं. कृषी पर्यटनाकडे जाण्याचं ठरलं. पण नोकरी काही सोडावी वाटत नव्हती. नोकरीमध्ये पुण्याला बदलीसाठी प्रयत्न केले पण ते फेल गेले. वर्ध्यातच कृषी पर्यटनाचा स्वतः अभ्यास सुरु केला. खूप अभ्यास केला. अनेक गोष्टींमध्ये प्रयत्न केले. पुढे वर्ध्यातली बँकेतील त्यांची नोकरी त्यांनी सोडली. मग ब्रेकअप देखील झालं.
पुढे राजीनामा देऊन मनोज मुंबईत आला. भावाकडे २ महिने राहिला. भावानेच नोकरी सोडण्यास सांगितले होते. मनोजचं कुठंच मन रमत नव्हतं. भावाला चुकी झाल्याचं वाटत होतं. भाऊ एकदा म्हणाल तुझं दुसरी काही करण्याची लायकीच नाही. हे शब्द मनोजला खूप लागले. रात्र जागून काढली. मनोजने घर सोडून जाण्याचे ठरवले. घरचे देखील जा म्हणले.
चाकणला मित्रांसोबत कांदा व्यवसाय सुरु केला. केरळला जाणं सुरु झालं. ट्रकने प्रवास करावा लागे. ७-८ महिने हे काम केलं. मनोजचं मन तिथंही रमलं नाही. शेवटी पर्यटनात काम करण्याचं ठरवलं. कृषी पर्यटनाचा अभ्यास केला. अनेक पुस्तक वाचली. मोराच्या चिंचोलीला ५ दिवस ट्रेनिंग घेतली. एप्रिल २०११ मध्ये द्राक्ष महोत्सव भरवला. त्यातून खूप प्रसिद्धी मिळाली.
महोत्सवाला आलेल्या लोकांनी राहण्याची देखील व्यवस्था करा असं सुचवलं. आजोबांच्या घरासारखी कुडाची घरं तिथं बनवली. आज तेच पराशर कृषी पर्यटन केंद्र जगाच्या नकाशावर पोहचलं आहे. सप्टेंबर २०११ ला सुरु केलेलं परेशान कृषी पर्यटन केंद्र नोव्हेंबर २०१२ ला देशातील पहिल्या दहामध्ये पहिल्या क्रमांकावर पोहचलं. आज मनोज हाडवळे हे महाराष्ट्र पर्यटन विभागाचे पर्यटन प्रशिक्षक म्हणून नियुक्त आहेत. आज पर्यंत २१ देशाच्या लोकांनी पराशरला भेट दिली आहे. वर्षाला त्यांचा १५-२० लाखांचा टर्नओव्हर होतो. पराशरमध्ये आज इटलीची लोक पाट्यावर वाटण मिरच्या वाटतात.