महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक अशा गोष्टी घडत असतात ज्याची देशपातळीवर दखल घेतली जाते देशपातळीवर त्याची चर्चा होते. महाराष्ट्राने देशाला नेहमीच दिशा दाखवण्याचं काम केलं आहे. महाराष्ट्राच्या भूमीत आजपर्यंत अनेक मोठे आणि दिग्गज नेते घडले ज्यांनी देशाचं नेतृत्व केलं. देशाच्या राजकारणात मोठं नाव असलेले अनेक नेते आजही महाराष्ट्राच्या भूमीत घडतात. देशाच्या राजकारणात मोठं नाव म्हणजे शरद पवार. शरद पवार यांना देशाच्या पंतप्रधानपदापर्यंतचा दावेदार मानलं गेलं.
शरद पवार हे महाराष्ट्राच्या भूमीत जन्मलेले देशाचे मोठे नेते आहेत. काँग्रेसच्या इंदिरा गांधींपासून राजीव गांधी, राहुल गांधी आणि भाजपच्या अटल बिहारी वाजपेयींनपासून अगदी नरेंद्र मोदींपर्यंत सर्वांसोबत शरद पवारांनी काम केलं आहे. ते ५० वर्षाहून अधिक काळापासून संसदेत आहेत. त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी अनेक मोठ्या पदावर काम केले आहे. देशाचे सरंक्षणमंत्री, कृषी मंत्री म्हणून त्यांचं कार्य आजही गौरविले जाते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणूनहि त्यांनी खूप काम काम केलं. सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून त्यांची नोंद आहे.
शरद पवार हे ९० च्या दशकात पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आले होते पण त्यांना या पदाने थोडक्यात हुलकावणी दिली. शरद पवार यांचं राजकारणात मोठं नाव असलं तरी त्यांच्यावर नेहमी पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप झाला. हा आरोप नेमका का होतो आणि यामागे काय कारण आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. या आरोपाला पार्श्वभूमी आहे पवारांच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदाची.
१९७८ चं ते साल होतं. वसंतदादा पाटील हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. या सरकारमध्ये शरद पवार देखील होते. पण पवार सरकारमधून बाहेर पडले. बाहेर पडून त्यांनी पुरोगामी लोकशाही दलाची स्थापना केली. या पुलोदचे महाराष्ट्रात सरकार आले आणि पवार मुख्यमंत्री झाले. यामुळे पवारांवर अनेकवर्ष खंजीर खुपसल्याची टीका झाली. शरद पवार यांनी खूप कमी वयात मुख्यमंत्री होत राज्याला आपले चातुर्य दाखवून दिले होते.
१९७५ मध्ये इंदिरा गांधी यांनी निवडणूक प्रचारात सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग केल्याचा आरोप झाला आणि अलाहाबाद हायकोर्टाने त्यांना दोषी ठरवत त्यांच्याविरोधात निर्णय दिला. ती निवडणूक रद्द करण्यासोबतच इंदिरा गांधींना सहा वर्षं निवडणूक लढवण्यावरही बंदी घालण्यात आली. यामुळे देशभरात गोंधळ झाला. इंदिराना विरोध वाढला. देशभर आंदोलनं झाली. याच गदारोळात इंदिरानि १९७५ मध्ये देशात आणीबाणी घोषित केली. १९७७ मध्ये आणीबानी मागे घेण्यात आली. नंतर देशात लोकसभा आणि महाराष्ट्रात १९७७ सालीच विधानसभा निवडणूक झाल्या.
आणीबाणीवेळी शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. आणीबाणीनंतर वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री बनले. आणीबाणीनंतर काँग्रेस फुटली. पक्षात २ गट पडले. यशवंतराव चव्हाण आणि ब्रम्हानंद रेड्डी यांनी इंदिरा यांचं नेतृत्व नाकारून रेड्डी काँग्रेसची स्थापना केली. शरद पवारही यशवंतरावांमुळे रेड्डी काँग्रेसमध्ये गेले. तर वसंतदादा पाटील देखील रेड्डी काँग्रेसमध्ये आले. १९७८ साली झालेल्या निवडणुकीत इंदिरा काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेसने स्वतंत्र निवडणूक लढवली.
याचा फटका इंदिरा काँग्रेसला बसला. जनता पक्षाने ९९ जागांवर मजल मारली तर इंदिरा काँग्रेस ६२ आणि रेड्डी काँग्रेस ६९ जागी विजयी झाले. शेकापच्या १३, माकप ९ आणि अपक्ष ३६ जागी निवडून आले. राज्यात त्रिशंकू स्थिती निर्माण झाली. जनता पक्षाला रोखण्यासाठी दोन्ही काँग्रेस एकत्र आल्या आणि काँग्रेसचे सरकार स्थापन झाले. रेड्डी काँग्रेसचे वसंतदादा पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर इंदिरा काँग्रेसचे नासिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री झाले.
पण हे सरकार जास्त दिवस टिकलं नाही. एकमेकांवरचा नाराजीमुळे सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात नाराज तयार झाले. दोन्ही काँग्रेसमध्ये दरी वाढत गेली. पावसाळी अधिवेशन सुरु झालं. अधिवेशन सुरु असतानाच पवारांनी संधी साधली. ४० आमदार घेऊन ते वसंतदादा सरकारमधून बाहेर पडले. सुशीलकुमार शिंदे, सुंदरराव सोळंके आणि दत्ता मेघे यांसारख्या मंत्र्यांनीही शरद पवारांसोबत राजीनामा दिला. पवारांच्या बंडखोरीमुळे आघाडी सरकार साडेचार महिन्यात कोसळलं.
शरद पवारांना यशवंतरावांचा छुपा पाठिंबा होता असं बोललं जाऊ लागलं. अजूनही अशी कुजबुज होते. पवारांनी समाजवादी काँग्रेसची स्थापना केली. एस एम जोशी, आबासाहेब कुलकर्णी, किसन वीर सारखे जेष्ठ नेते पवारांच्या पाठीशी उभे राहिले. १८ जुलै १९७८ रोजी पहिल्यांदाच महाराष्ट्रात बिगर काँग्रेस सरकार सत्तेत आलं होतं. ३८ व्या वर्षी पवार महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री झाले.
पवारांच्या मंत्रिमंडळात सुंदरराव सोळंके हे उपमुख्यमंत्री होते. शंकरराव चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, गोविंदराव आदिक, दत्ता मेघे, सदानंद वर्दे, भाई वैद्य उत्तमराव पाटील, अर्जुनराव कस्तुरे, निहाल अहमद आणि गणपतराव देशमुख यांच्यासारखे नेतेही त्यावेळी पवारांच्या पुलोद सरकारमध्ये मंत्री होते. पण पुढे १९८० मध्ये इंदिरा गांधींच्या शिफारशीनंतर राष्ट्रपतींनी शरद पवारांचं पुलोदचं सरकार बरखास्त केलं आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली. १९८० ला इंदिरा काँग्रेस राज्यात पुन्हा सत्तेत आलं. ए आर अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. तर पवार हे विरोधी पक्षात राहिले. ६ वर्षांनी पुन्हा पवार १९८७ साली राजीव गांधी यांच्या नेतृत्वात इंदिरा काँग्रेसमध्ये आले.