भारतामध्ये संगीत क्षेत्राला खऱ्या अर्थाने एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचे श्रेय कुणाला द्यायचे असेल तर ते गुलशन कुमार यांना द्यावे लागेल. कॅसेट किंग या नावाने परिचित असणाऱ्या गुलशन कुमारांचा जन्म कदाचित भारतीय संगीत विश्वाला नवा जन्म देण्यासाठीच झाला होता. लहानपणी आपल्या वडिलांना दिल्लीतील दरियागंज भागात फळांचा ज्यूस विकण्यासाठी मदत करणारा गुलशन कुमार एक दिवस टी-सिरीज या भारतातील सर्वात मोठ्या म्युझिक कंपनीचा मालक बनेल असे स्वतः त्यालाही वाटले नसेल.
गुलशन कुमार हे पहिल्यापासूनच हरहुन्नरी माणूस ! त्यांच्या फळांच्या ज्यूसच्या गाड्यावर येणाऱ्या ज्येष्ठ लोकांशी त्यांचं चांगलं जमायचं. तिथेच त्याला समजले की या म्हाताऱ्या लोकांची नजर कमजोर असल्याने त्यांना धार्मिक पुस्तकं वाचता येत नाहीत. इथे त्याला संधी दिसली. त्याचकाळात संगीत क्षेत्रातील तंत्रज्ञानात बदल होत होते. जुने रेकॉर्डर जाऊन कॅसेट्सचे नवीन तंत्रज्ञान आले होते. या तंत्रज्ञानाची खासियत म्हणजे या कॅसेट्समध्ये गाणी रेकॉर्ड करण्याची आणि पुन्हा ते गाणे इरेज करुन नवीन गाणे रेकॉर्ड करण्याची सुविधा होती.
सुरुवातीला १९७० च्या काळात गुलशन कुमारांनी भक्तिगीते रेकॉर्ड करुन त्याची कॅसेट्स बाजारात विकली. त्यांची कॅसेट्स इतर कंपन्यांच्या तुलनेत एक तृतीयांश दराने स्वस्त असायची. त्यांचा हा प्रयोग लोकांना चांगलाच आवडला आणि त्यांच्या कॅसेट्सला मागणी वाढली. त्यानंतर ते धार्मिक स्थळांचे व्हिडीओ काढून त्याचे कॅसेट्स बनवायला लागले. ११ जुलै १९८३ रोजी त्यांनी सुपर कॅसेट्स इंडस्ट्रीची स्थापना केली. या कंपनी अंतर्गतच त्यांनी टी-सिरीज हे म्युझिक लेबल लाँच केले.
१९९० मध्ये आलेला चित्रपट आशिकी हा त्याच्या कंपनीचा पहिला हिट म्युझिक अल्बम ठरला. तिथून टी-सिरीज आणि गुलशन कुमार ही नावे एकाचढीत एक अशी गाजायला लागली. साजन, दिल है की मानता नही, दिलवाले, राजा हिंदुस्थानी, फुल और काटे, परदेस, सडक, दिवाना इत्यादि अनेक सुपरहिट चित्रपटांची गाण्यांची दर्जेदार कॅसेट्स त्यांनी आणली. त्यांच्या कंपनीने नदीम-श्रवण, सोनू निगम, अनुराधा पौडवाल, कुमार सानू सारख्या अनेक गायकांना संधी देऊन मोठे केले. पण या यशातूनच अनेक शत्रूही उभे राहिले.
नदीम-श्रवण या जोडीतील नदीमच्या एका अल्बमला टी-सीरिजने प्रमोट न केल्याचा राग त्याच्या मनात होता. तसेच गुलशन कुमार नवनव्या संगीतकारांना प्रमोट करत असल्याने आपल्या पोटावर पाय देत असल्याचेही नदीमला वाटले. गुलशनवर दबाव टाकण्यासाठी नदीमने अंडरवर्ल्डचा आधार घेतला. दा ऊदचा खास माणूस अबू सालेमला त्याने गुलशनवर दबाव टाकण्यास सांगितले.
त्याने १० कोटींची खं डणी मागितली, पण मी खंडणी देण्याऐवजी वैष्णोदेवीला भंडारा वाहीन असे उत्तर गुलशनने दिले. याचा राग मनात धरुन १२ ऑगस्ट १९९७ रोजी अबू सालेमने तीन मारेकरी पाठवले. मुंबईच्या जीतेश्वर महादेव मंदिरात पूजा करुन परत येणाऱ्या गुलशन कुमारांवर १७ गोळ्या झाडून त्यांची ह त्या करण्यात आली. त्यानंतर नदीम फरार झाला. अबू सालेमला पकडले. या प्रकरणी इतर सर्वांना सोडून देत कोर्टाने अब्दुल रऊफ नावाच्या गुन्हेगाराला दोषी ठरवले आणि आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावली.